Friday, January 24, 2020

"हे विश्वची माझे घर" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ४



हे विश्वची माझे घर



ही गोष्ट अजून काही वर्षांनंतरची – भविष्यकाळातील गोष्ट आहे.

गीरच्या जंगलात, सिंहांचं संवर्धन इतकं यशस्वी झालं की चौदाशे वर्ग किलोमिटरचं जंगल सिंहांना अपूरं पडू लागलं. सिंहांच्या टोळ्या एकमेकांच्या क्षेत्रांवर ताबा सांगू लागल्या. त्यातून टोळीयुद्धाला सुरुवात होऊ लागली. सिंहांची संख्या खूप वाढल्यामुळे पुरेश्या शिकारी मिळणं कठीण होऊ लागलं. एकुणातच गीरच्या जंगलात अनागोंदी माजायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/GpdU9dxoekju2BaP7

यातून बाहेर पडलं नाही तर सततची टोळी युद्ध, अशांती, भुकमरी हे अटळ आहे हे गीरकेसरी कुटुंबाच्या तरुण सिंहाला कळलं होतं. गीरच्या दक्षिणेला, सह्याद्री पर्वताच्या जंगलां मधून बिबटे आणि तुरळक वाघ सोडले तर मार्जारवंशीय फारसे मोठे प्राणी नाहीत ही पक्की माहीती त्यानी काढली होती. कितीही, हवी हवीशी, प्रीय असली तरी आपल्या जन्म भूमीत आपला निभाव लागणार नाही, आपल्याला किंमत राहाणार नाही हे जर वाटत असेल तर आपले प्रीयजन सोडून नवी भूमी आपली कर्मभूमी करावी लागणार हे समजण्या इतका तो प्रगल्भ होता.

सगळ्या कुटुंबाचा निरोप घेउन तो निघाला. त्याला वाटलं तेवढं निरोप घेणं सोपं नव्हतं. त्याच्या बायकापोरांनी, मित्र-आप्तेष्टांनी त्याला जाण्या पासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला. पण ह्या कुठल्याही मोहात न अडकता तो निघाला. संह्याद्रीच्या जंगलात मोठे मार्जार फारसे नाहीत कारण माणसाने ते शिल्लक ठेवले नाहीत अशी त्याला भितीही घालून झाली पण तरीही तो निघाला. इतकाच विचार करून की ‘मरण इकडेही आहे आणि कदाचीत तिकडेही. पण म्हणून कुठलेही प्रयत्न न करता हातावर हात धरून बसणं हा निव्वळ मुर्खपणा आहे. जेव्हा तिकडे आपलं बस्तान उत्तम बसेल, तेव्हाच सगळ्यांना आपलं म्हणणं पटेल’ हा त्याला सार्थ विश्वास होता.


Pic Credit: https://images.app.goo.gl/dNAs8gyP2C1mQxPw8

तो निघाला खरा, पण त्याच्या प्रत्येक पावलावर नवीन नवीन संकटं आ वासून उभी होती. एका जंगलातून दुस-या जंगलात जाणारे वन मार्ग माणसाने शिल्लक ठेवले नव्हते. त्यामुळे दिवसा ढवळ्या माणसाच्या नजरेस पडणार नाही असं गावाच्या बाहेर झाडीत, टेकडीवर लपून राहायचं आणि रात्रीच्या अंधारात, ओस पडलेल्या रस्त्यांवरून मार्गाक्रमण करत राहायचं. कित्येक दिवस असेही जायचे की शिकार ही मिळायची नाही तरी चालत राहाणं आणि गावं ओलांडणं भाग होतं. बरं, गावातले रस्ते सहसा रात्री ओस असत पण दोन गावांना जोडणा-या महामार्गांवर, वेगवान वाहानांची सततची वर्दळ. उभं आयुष्य जंगलात काढलेल्या त्या तरुण सिंहाला त्या वाहानांनी पार धडकी भरायची. त्या वाहानांचे डोळे दिपवणारे प्रखर दिवे, कर्णकर्कश्य भोंगे आणि भरीस भर म्हणून जीवघेणा वेग. दोन-तीन वेळा तर मोठ्या मोठ्या वाहानांना धडक होऊन मरता मरता तो वाचला. धडक झालीच, किंवा गाडी समोर आलीच तर जवळच्या झाडीत तो धूम ठोकत असे. कारण माणसांनी पाहीलं तर भितीच्या नावा खाली ते काय करतील याचा काही नेम नाही.

Pic Credit: https://images.app.goo.gl/avNuL4LFR1dqYErk8

पण सरते शेवटी मजल दरमजल करत तो सह्याद्रीच्या कुशीत पोचला. एक मोठा टप्पा पार पडला खरा पण संकटं काही संपायचं नाव घेत नव्हती. गीरच्या मुख्यत्वे सपाट जंगालां ऐवजी, सह्याद्रीची ऊंच सखल जमिन. ह्या पर्वतीय प्रदेशात शिकार दिसणं आणि मग ती करणं हे ये-यागबाळ्याचं काम नव्हतं. सपाट जंगलामधे शिकार करायला रुळलेलं शरीर डोंगरावर शिकार करायला साथ देत नव्हतं. कित्येक वेळा आपण येऊन चूक केली का असं त्याला वाटे. आपल्या परीवाराच्या, मित्रांच्या आठवणीने जीव अगदी काकूळतीला येई. इथे येण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होई. सगळं सोडून परत आपल्या जंगलात, आपल्या कुटुंबाकडे परत जाण्याचा विचार येई. एकटेपणा, उपासमार, अवघड भूक्षेत्र सगळेच  त्याची परीक्षा पाहात होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/ecUwGvTySRQ5zB6w9

पण मग तो स्वताःला समजावे, 'आपल्या गीरच्या जंगलात होणा-या त्रासा पासून वाचायला इथे आलो ना. इथे शिकार करणं अवघड नक्की आहे, पण शिकारीयोग्य प्राणी भरपूर आहेत. जमीन वावरायला सोपी नाही पण दूर दूर पर्यंत गीरसारखी सिंहाची किंवा इतर मोठ्या मार्जारवंशीयांची गर्दीही नाही. एकुणात इथे बस्तान बसवणं अवघड आहे; पण एकदा का ते जमलं की आपणच ह्या जंगलाचे राजे होणार!'

आणि त्या दृष्टीने त्यानी प्रयत्न सुरु केले. आधी ते जंगल पालथं घातलं त्यानी, तिथे काय काय आहे, कसं, कुठे कोण प्राणी आहेत, त्यांच्या जमेच्या बाजू कुठल्या आणि कमकुवत बाजु कुठल्या, आपल्या कुठल्या, आपल्याला कशात काय बदल करावा लागेल, काय सुधारणा स्वतःत करावी लागेल. ह्या सगळ्यावर बारकाईने आभ्यास करून तो एक एक पाऊल टाकू लागला, वाढु लागला. हळू हळू, आपल्या ह्या सह्यकेसरीची जंगलात दहशत पसरू लागली आणि थोड्याच दिवसात तो त्या सह्याद्रीच्या जंगलाचा अनभिषिक्त सम्राट झाला.



त्यानंतर त्यानी त्याचं सबंध कुटुंब सह्याद्रीच्या त्या जंगलात आणलं. सुरुवातीला सगळ्यांना नविन जागेशी जुळवुन घेणं अवघड गेलं, पण कोणीच ताकदीचा प्रतीस्पर्धी नसलेल्या त्या जंगलात त्यांचं कुटुंब सुखानी राहू लागलं. त्यांना जरी ह्या त्रासातून जावं लागलं असलं तरी त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य सुरक्षित केल्याचं समाधान त्यांना झालं. गीरची आठवण होते त्यांना अधून मधून पण ह्या नविन जंगलाशीही त्यांचं घट्ट नातं तयार झालय! आणि पुढच्या पिढी साठी संह्याद्रीचं हे उंच सखल जंगलच त्यांचं मुळ घर झालय.

Pic Credit: https://images.app.goo.gl/hLjr5Yeuaa88V5yo8

सिंहांच्या ह्या धाडशी संक्रमणानी एक मात्र व्हावं, वेगवेगळी जंगलं जोडणारे वनमार्ग राखण्याचं मनुष्यप्राण्यानी मनावर घ्यावं!

तात्पर्यः १. चांगली किंवा वाईट परिस्थिती ही सद्य स्थितीत सुधारणा करण्याची एक संधीच असते.
२. स्वतःवर विश्वास ठेऊन प्रतीकुल प्रदेशात सुधारणा शक्य नसेल तर तिथुन बाहेर पडून नविन प्रदेश अनुकुल बनवता येऊ शकतो.
३. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कठिणातील कठिण परिस्थीतीवर मात करता येते.
४. कुटुंब, मित्र बरोबर नसतील तर मोठ्यातला मोठा विजयही अर्थहीन ठरतो.

Thursday, January 16, 2020

"तू साद दे" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ३

डिस्कव्हरी वाहीनीवर प्रसारीत झालेल्या माहीतीपटावर आधारीत.



तू साद दे


Pic Credit: https://images.app.goo.gl/R3GoZQa7RgXa4tMfA

गुजराथच्या गीर अभयारण्याच्या संरक्षित क्षेत्रातली ही गोष्ट. आशियायी सिंहांचं हे एकमेव वस्ती स्थान. अभयारण्याच्या मुख्यक्षेत्राला वेढून असलेलं जंगल आणि तुरळक मनुष्यवस्तीचं बेमालूम मिश्रण म्हणजे हे संरक्षित क्षेत्र.

Pic Credit: http://www.conservingcentralindia.org/uploads/1/8/1/8/18187127/published/handbook-1.jpg?1522696260

अभयारण्याच्या मुख्यक्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढली की अन्नाच्या शोधात तिथले प्राणी बाहेर येऊ लागतात. मनुष्यवस्तीतील शेतं ही त्या बाहेर आलेल्या हरणं, सांभार, गव्यांसाठी नवी कुरणं होतात आणि त्यांचा माग घेत घेत जंगलातले मांसभक्षीही तिथे शिकारीसाठी वास्तव्य करू लागतात. हे सगळं माणसाच्या नजरेआड आणि मग कधी कधी माणसाच्या नजरे समोर वर्षानुवर्ष चालत असतं.

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRkiJtCQ-bdibNZGY5rTjK2MvwsbLfbSX5AY1flEVpveUWO6Zqo-w&s

आपलं गीरचं जंगलही त्याला काही अपवाद नव्हतं. जंगलातल्या हरणांना १२ महीने शेतात मिळणा-या मेजवानीचा सुगावा लागला होता. शेतातली माणसं दिवस ढळल्यावर घराकडे परतत हे ही त्या हरणांनी हेरून ठेवलं होतं. त्यामुळे रात्र झाल्यावर ते शेतात शिरत आणि पिकांचा फडशा पाडत.

गावातल्या लोकांनाही ह्याची चाहूल लागली होती आणि म्हणून ते ही शेतावर आळीपाळीनी गस्त घालात. हरणं शेतात घुसली की गस्तीवरची माणसं हाळी देऊन बाकीच्यांना जागं करत आणि मग सगळे मिळून आटापिटा करून त्या हरणांच्या झुंडीला पळवून लावायचा प्रयत्न करत. रोजचाच हा जणू खेळ झाला होता आणि हे गावकरी त्या हरणांना चांगलेच कंटाळले होते.

Pic Credit: https://images.app.goo.gl/AgFfwcks7yVEx6Jh7

गावाजवळच्या एका टेकडीवरून स्वतःच्या कळपातून सिंहाच्या रीतीप्रमाणे नुकताच बाहेर निघालेला एक तरुण सिंह बरेच दिवस हा सगळा प्रकार बघत होता. त्यला कळून चुकलं होतं की गस्तीवरच्या माणसांनी हाळी दिली ह्याचा अर्थ हरणं शेतात शिरलीयत. जुन्या कळपातून आलेल्या शिकारीच्या अनुभवावरून त्यानी हे ही ओळखलं होतं की हरणं जेव्हा ओळखीच्या परीसरात नसतात तेव्हा अधिक भेदरलेली असतात. शेत आणि पुढे मानवी वस्ती असल्याने, पळून जायला, लपून राहायलाही फारशी जागा नसते आणि त्यामुळे सहज शिकार बनू शकतात.

Pic Credit: https://images.app.goo.gl/K6EkRwVk7Gfpr4pX8

प्रश्ण फक्त एवढाच होता की भर वस्तीत माणसाच्या इतक्या जवळ जाणं ह्यात मोठा धोका होता. कारण माणसाचा काही भरवसा नाही. माणसा इतका मायाळू आणि माणसा इतका क्रूर जगात दुसरा प्राणी नाही. हाळी ऐकून आपण हरणांची शिकार करायला जायचं आणि तेव्हढ्यात गावातली बाकीची माणसं आली तर हरणं सोडून ती आपल्याच मागे लागायची आणि आपला नाहक बळी जायचा अशी त्या तरूण केसरीची रास्त भिती होती.

पण त्याला इतकी सहज शिकार सोडून देणं हे मुर्ख पणाचं आहे हे ही कळत होतं. आणि त्यच्या डोक्यात एक कल्पना सुचाली. धोका पत्करायचा पण मोजुनमापून आणि नियोजनपुर्वक.

रोज रात्री टेकडी ऐवजी शेताजवळच्या झाडीत कोणाला दिसणार नाही असं लपून राहायचं. म्हणजे हळी ऐकून टेकडी उतरून येण्याचा वेळ वाचेल. माणसाची हाळी आली की तत्क्षणी सर्वात जवळचं सावज हेरून शिकार करायची आणि गावातली माणसं यायच्या आत शिकार घेउन झाडीत गायब व्हायचं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/NTpDa6ib4tBXrNY78

ह्या नियोजनबद्ध आणि मोजका धोका पत्करण्याचा त्याला फायदाही होऊ लागला. फारसे कष्ट न घेता त्याला शिकार मिळू लागली. त्यानी ही मोठ्या दिलदार मनानी त्याची ही युक्ती त्याच्या इतर तरूण, कळपातून नुकत्याच बाहेर पडलेल्या मित्रांना सांगितली. बघता बघता शेतावरच्या हरणांची शिकार करणारी सिहांची टोळीच तयार झाली.

आता हाळी वाजली की सिंह यायचे, शिकार करायचे त्यांना शिकार करताना बघून बाकी हरणं जंगलात पळून जायची. गावातून जागी होऊन माणसं यायच्या आत शेत मोकळं!

Pic Credit: https://encrypted-tbn0.gstatic.com/images?q=tbn:ANd9GcRbjP7sWIdXhs_nvJeu-8aVbLIl4jMjExVeCE0HJi3RvJeL_luFxw&s

काही हुशार गावक-यांना हा सगळा प्रकार कळून चुकला. सिंहांना घाबरण्याची नाही तर उलट त्यांना बोलावण्याची गरज आहे हे त्यांना उमगलं. शेतात हरणं शिरली की गावातून कोणी यायची गरज नाही की आटापिटा करून हरणांना हुसकावण्याची ही गरज नाही. एक हाळी मारायची, सिहांना बोलवायचं आणि स्वस्थ बसायचं. एकमेकांना मदत करून जीवन कीती सोपं होतं!

Pic Credit: https://images.app.goo.gl/aSnEDP87Q5LCc1aN9

सिंह आणि माणसाची अशी दोस्ती झाल्याचं दुसरं कुठलं उदाहरण नसेल! आणि भोळ्या हरणांना त्यांच्या ह्या योजनेचा सुगावा लागे पर्यंत तरी ही दोस्ती अशीच अबाधित राहील.

तात्पर्यः १. बारकाईनं निरिक्षण केलं तर मोठे मोठे प्रश्ण सहज सुटतात.
      २. मोजकाच पण नियोजनपुर्वक पत्करलेला धोका चांगलीच फळं देतो.
      ३. इतरांना केलेल्या मदतीचा तुम्हालाही फायदा होतो.
      ४. माणुस आणि प्राणी गुण्या गोविंदानी राहू शकतात.

_______________________________________________________________________

"नाही म्हणजे नाहीच!" – छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ५
"घे भरारी" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - ६

Saturday, January 4, 2020

"मन धागा धागा जोडते" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - २

मन धागा धागा जोडते

Pic Credit: https://images.app.goo.gl/qYubKW119YBES2u5A



आसामच्या दूरवर पसरलेल्या काझीरंगा जंगलातली ही गोष्ट. ब्रम्हपुत्र नदाच्या आणि गजगवताच्या मधल्या कुरणांवर एकशिंगी गेंड्यांचं एक कुटुंब राहात असे. एक धष्टपुष्ट नर गेंडा, त्याची बायको आणि त्यांचा एक गुबगुबीत अवखळ बछडा.



ब्रह्मपुत्र नदाचं पात्र इतकं विशाल की एका किना-यावरून दुसरा किनारा दिसत नाही. म्हणूनच हा ब्रह्मपुत्र नद म्हणवला जातो ब्रह्मपुत्रा नदी नाही. आणि हत्ती एवढ्ं उंच वाढणारं गवत म्हणून ते गजगवत.

तर एकाबाजुला मैलोंमैल पसरलेलं नदाचं पात्रं आणि दुस-या बाजुला निबिड असं गवताचं जंगल त्यामुळे हे आपलं गेंड्याचं कुटुंबं बाकीच्या जंगलापासून तसं वेगळंच असायचं. खायला प्यायलाही मुबलक होतं त्यामुळे कुठे जायची ही गरज नव्हती. गेंड्याच्या बछड्यानी तर इतर कुठले प्राणीही फारसे कधी पाहीले नसावेत.



Pic Credit: https://images.app.goo.gl/QxunmmXtYWKUxWt97

आपला नर गेंडामात्र सकाळ झाली की त्यांच्या कुरणावर गस्त घालायला निघायचा आणि सुर्यास्ता वेळी त्याच्या कुटुंबाकडे परतायचा. येताना बच्चू गेंड्यासाठी कधी दूरवरून कोवळं कोवळं गवत आणायचा, तर कधी सुवासिक मऊ लुसलिशित फुलं खायला आणायचा तर कधी गोड गोड रसाळ फळं आणायचा. त्यामुळे आपला बच्चू गेंडा त्याच्या बाबाची अगदी आतुरतेने वाट बघायचा. रात्र झाली, कुरणांवर थंडीची घट्ट दुलई पसरली की बाबा गेंड्याच्या उबदार कुशित आपला बच्चू गेंडा गाढ झोपी जाई.

एक दिवस असाच बाबा गेंडा गस्त घालायला गेला आणि सुर्यास्त झाला, रात्र झाली, तरी परत आलाच नाही. आपला बच्चू वाट बघून बघून, रडून, दमून थकून झोपून गेला. दुस-या दिवशिही जेव्हा बाबा परत आला नाही, तेव्हा मात्र आपल्या बच्चूनं ठरवलं की आपणच बाबाला शोधायला निघायचं.

त्याच्या आईला घेऊन तो निघाला तिन चार दिवस फिरून त्यांनी त्यांचं अख्ख कुरण पालथं घातलं तरी त्याला बाबा मिळाला नाही. निराश होऊन ते त्यांच्या नेहमीच्या जागी परतणार तोच त्यांना गजगवतात निपचीत पडलेलं बाबा गेंड्याचं शव दिसलं. शव होतं खरं, पण बाबा गेंड्याचं सुडौल, ऐटदार शिंग मात्र गायब होतं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/DCByhtg1w258ddNn8


बच्चूच्या आईला काय समजायचं ते समजलं. बच्चूनं पुन्हा पुन्हा आग्रह, हट्ट केल्यावर आईनी त्याला सांगितलं, “अरे, आपल्या गेंड्यांच्या शिंगाना अंतरराष्ट्रीय बाजारात खूप किंमत आहे. चिन देशात तर आपल्या शिंगांचा पारंपारीक औषधात उपयोग करतात आणि म्हणूनच तस्करांनी, तुझ्या बाबांची अशी शिकार केली. आपल्या आसपास शिका-यांचा वावर आहे हे वेळीच आपल्याला कळलं असतं तर कदाचीत आपण सुरक्षित स्थळी गेलो असतो आणि बाबा वाचले असते” असं म्हणून आई धाय मोकलून रडायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/KapN38c1ytWP8wBa7

स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचाही बळी घेण्यास तयार होणा-या, कुठलाही विचार न करता दुस-यांना दुःख देणा-या त्या वृत्तीची बच्चूला किळस आली. मात्र पुढच्याच क्षणात तो मोठा झाला. आईला चाटून चाटून शांत करू लागला पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. ‘आज हे बाबा बाबतीत झालं, उद्या माझ्या किंवा आईच्या बाबतीत हे होऊ शकतं. हे थांबायला पाहीजे. आई म्हणतीय तशी शिका-यांची माहीती आपल्याला मिळालीच पाहीजे. आपल्याला ओळख वाढवली पाहीजे. इतर गेंड्यांशीच नव्हे तर जंगलातल्या जास्तीत जास्त प्राण्यांशी. कोणी ना कोणी तरी त्या शिका-यांना जंगलात येताना, सापळा रचताना, शिकारीवर पाळत ठेवताना बघेल आणि आपल्याला येऊन सांगेल.’ आपण ओळखच नाही केली, ठेवली, वाढवली तर ही माहीती मिळणं केवळ अशक्य आहे हे त्यानी अगदी मनोमन ओळखलं.

ओळख वाढवायची खरी, पण खरा प्रश्ण तर पुढेच होता की कशी?

आधी आधी तो दुस-या प्राण्या समोर जाई पण मग शरमेने, भिडस्तपणाने काहीच न बोलता निघून येई, आई बाबांच्या सावलीतून कधीच बाहेर न पडलेल्या त्याला हे सगळं खूप नवीन आणि अवघड होतं. पण त्याची जिद्दही प्रचंड होती.

मग हळू ह्ळू तो दुस-या प्राण्या समोर जाऊन हसू लागला, नमस्कार म्हणू लागला, शिळोप्याच्या, हवापाण्याच्या गप्पा मारू लागला. ओळख होत होती.

जंगलात फिरताना एखाद्या ओळखीच्या प्राण्याच्या भागातून जात असला तर थोडी वाट वाकडी करून मुद्दाम त्या प्राण्याला भेटून येई – अर्थात त्याच्या वेळ पाहून. कुठल्याही कामा शिवाय, अपेक्षे शिवाय तो हे करत होता. तो ओळख ठेवत होता.

Pic Credit: https://images.app.goo.gl/F3K9dvoNgeoDVhBm7

एक दोन भेटीत त्याला समोरच्या प्राण्याच्या आवडी निवडी कळू लागल्या मग तो त्या अनुषंगानी त्यांच्याशी बोलू लागला, त्यांना आवडणा-या विषयाची अधिकाधिक माहीती करून घेऊ लागला, त्या प्राण्यांना ती माहीती नसेल तर ती देऊ लागला, सहज शक्य असल्यास त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना भेट देऊ लागला. अगदी निरपेक्ष भावाने. तो ओळख वाढवत होता.

आता त्याची ओळख त्याच्या एवढ्या, त्याच्या पेक्षा छोट्या, मोठ्या सगळ्या प्राण्यांशी, पक्षांशी झाली होती. इतकच काय, प्रत्येक गेंडा सवयीनं एकाच ठिकाणी मैला विसर्जन करतो, त्या लीद मधे काही किडे आपलं जिवन व्यतीत करतात. त्या किड्यांशीही तो मायेने पण आपला आणि त्यांचा आब राखून बोलत असे.

त्याला कधी शिकारी दिसले तर तो ईतरांना सावध करी. बोलता बोलता तो इतर प्राण्यांनाही असं करण्याची विनंती करे. आणि सगळ्यांच्या आवडत्या बच्चूची विनंती कोण ऐकणार नाही? जंगलात काही खुट्ट जरी वाजलं तरी त्याला कळू लागलं, शिकारी यायच्या आधिच आईला ईतर मित्रांना सुरक्षित स्थळी घेऊन जाता येऊ लागलं.

बघता बघता त्याच्या ओळखी खूप वाढल्या आणि त्याचा फायदा त्याला शिका-यांपासून वाचायला तर झालाच पण त्या शिवाय त्याला कोवळं लुसलिशित गवत कुठे आहे, रसदार फळं कुठे आहेत हे ही कळू लागलं. दर पावसाळ्यात ब्रह्मपुत्रला येणा-या संभाव्य पुराची नदीच्या उत्तर तटावर राहाणा-या प्राण्यांकडून पुर्व सुचना मिळू लागली. त्यातून सगळ्यांना वाचवता येऊ लागले. साध्या एका ओळख ठेवण्याच्या, वाढवण्याच्या सवयीनी इतका फायदा होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं!

एकुणात आपला बच्चू सुखानं काझीरंगात विहरू लागला!

Pic Credit: https://images.app.goo.gl/fkRXjjdqzUV9jdcPA


तात्पर्यः १. होऊन गेलेल्या घटनांचं दुखः करत बसण्यात काहीच हाशिल नाही.
       २. पुर्ण मनापासून, जिद्दीनं केलेल्या कामात यश मिळतच.
      २. आपण शक्य ती मदत निरपेक्षपणे करत जावी. कधी ना कधी त्याचा नक्कीच आपल्याला           फायदा होतो.
      ३. ओळख जपणे, वाढवणे हे ज्याला जमतं त्याचं आयुष्य खूप सुखकर होतं

_______________________________________________________________________