Saturday, January 4, 2020

"मन धागा धागा जोडते" - छोट्यांच्या मोठ्ठ्या गोष्टी - २

मन धागा धागा जोडते

Pic Credit: https://images.app.goo.gl/qYubKW119YBES2u5A



आसामच्या दूरवर पसरलेल्या काझीरंगा जंगलातली ही गोष्ट. ब्रम्हपुत्र नदाच्या आणि गजगवताच्या मधल्या कुरणांवर एकशिंगी गेंड्यांचं एक कुटुंब राहात असे. एक धष्टपुष्ट नर गेंडा, त्याची बायको आणि त्यांचा एक गुबगुबीत अवखळ बछडा.



ब्रह्मपुत्र नदाचं पात्र इतकं विशाल की एका किना-यावरून दुसरा किनारा दिसत नाही. म्हणूनच हा ब्रह्मपुत्र नद म्हणवला जातो ब्रह्मपुत्रा नदी नाही. आणि हत्ती एवढ्ं उंच वाढणारं गवत म्हणून ते गजगवत.

तर एकाबाजुला मैलोंमैल पसरलेलं नदाचं पात्रं आणि दुस-या बाजुला निबिड असं गवताचं जंगल त्यामुळे हे आपलं गेंड्याचं कुटुंबं बाकीच्या जंगलापासून तसं वेगळंच असायचं. खायला प्यायलाही मुबलक होतं त्यामुळे कुठे जायची ही गरज नव्हती. गेंड्याच्या बछड्यानी तर इतर कुठले प्राणीही फारसे कधी पाहीले नसावेत.



Pic Credit: https://images.app.goo.gl/QxunmmXtYWKUxWt97

आपला नर गेंडामात्र सकाळ झाली की त्यांच्या कुरणावर गस्त घालायला निघायचा आणि सुर्यास्ता वेळी त्याच्या कुटुंबाकडे परतायचा. येताना बच्चू गेंड्यासाठी कधी दूरवरून कोवळं कोवळं गवत आणायचा, तर कधी सुवासिक मऊ लुसलिशित फुलं खायला आणायचा तर कधी गोड गोड रसाळ फळं आणायचा. त्यामुळे आपला बच्चू गेंडा त्याच्या बाबाची अगदी आतुरतेने वाट बघायचा. रात्र झाली, कुरणांवर थंडीची घट्ट दुलई पसरली की बाबा गेंड्याच्या उबदार कुशित आपला बच्चू गेंडा गाढ झोपी जाई.

एक दिवस असाच बाबा गेंडा गस्त घालायला गेला आणि सुर्यास्त झाला, रात्र झाली, तरी परत आलाच नाही. आपला बच्चू वाट बघून बघून, रडून, दमून थकून झोपून गेला. दुस-या दिवशिही जेव्हा बाबा परत आला नाही, तेव्हा मात्र आपल्या बच्चूनं ठरवलं की आपणच बाबाला शोधायला निघायचं.

त्याच्या आईला घेऊन तो निघाला तिन चार दिवस फिरून त्यांनी त्यांचं अख्ख कुरण पालथं घातलं तरी त्याला बाबा मिळाला नाही. निराश होऊन ते त्यांच्या नेहमीच्या जागी परतणार तोच त्यांना गजगवतात निपचीत पडलेलं बाबा गेंड्याचं शव दिसलं. शव होतं खरं, पण बाबा गेंड्याचं सुडौल, ऐटदार शिंग मात्र गायब होतं.

Pic Credit: https://images.app.goo.gl/DCByhtg1w258ddNn8


बच्चूच्या आईला काय समजायचं ते समजलं. बच्चूनं पुन्हा पुन्हा आग्रह, हट्ट केल्यावर आईनी त्याला सांगितलं, “अरे, आपल्या गेंड्यांच्या शिंगाना अंतरराष्ट्रीय बाजारात खूप किंमत आहे. चिन देशात तर आपल्या शिंगांचा पारंपारीक औषधात उपयोग करतात आणि म्हणूनच तस्करांनी, तुझ्या बाबांची अशी शिकार केली. आपल्या आसपास शिका-यांचा वावर आहे हे वेळीच आपल्याला कळलं असतं तर कदाचीत आपण सुरक्षित स्थळी गेलो असतो आणि बाबा वाचले असते” असं म्हणून आई धाय मोकलून रडायला लागली.

Pic Credit: https://images.app.goo.gl/KapN38c1ytWP8wBa7

स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाचाही बळी घेण्यास तयार होणा-या, कुठलाही विचार न करता दुस-यांना दुःख देणा-या त्या वृत्तीची बच्चूला किळस आली. मात्र पुढच्याच क्षणात तो मोठा झाला. आईला चाटून चाटून शांत करू लागला पण त्याच्या डोक्यात मात्र विचारांनी थैमान घातलं होतं. ‘आज हे बाबा बाबतीत झालं, उद्या माझ्या किंवा आईच्या बाबतीत हे होऊ शकतं. हे थांबायला पाहीजे. आई म्हणतीय तशी शिका-यांची माहीती आपल्याला मिळालीच पाहीजे. आपल्याला ओळख वाढवली पाहीजे. इतर गेंड्यांशीच नव्हे तर जंगलातल्या जास्तीत जास्त प्राण्यांशी. कोणी ना कोणी तरी त्या शिका-यांना जंगलात येताना, सापळा रचताना, शिकारीवर पाळत ठेवताना बघेल आणि आपल्याला येऊन सांगेल.’ आपण ओळखच नाही केली, ठेवली, वाढवली तर ही माहीती मिळणं केवळ अशक्य आहे हे त्यानी अगदी मनोमन ओळखलं.

ओळख वाढवायची खरी, पण खरा प्रश्ण तर पुढेच होता की कशी?

आधी आधी तो दुस-या प्राण्या समोर जाई पण मग शरमेने, भिडस्तपणाने काहीच न बोलता निघून येई, आई बाबांच्या सावलीतून कधीच बाहेर न पडलेल्या त्याला हे सगळं खूप नवीन आणि अवघड होतं. पण त्याची जिद्दही प्रचंड होती.

मग हळू ह्ळू तो दुस-या प्राण्या समोर जाऊन हसू लागला, नमस्कार म्हणू लागला, शिळोप्याच्या, हवापाण्याच्या गप्पा मारू लागला. ओळख होत होती.

जंगलात फिरताना एखाद्या ओळखीच्या प्राण्याच्या भागातून जात असला तर थोडी वाट वाकडी करून मुद्दाम त्या प्राण्याला भेटून येई – अर्थात त्याच्या वेळ पाहून. कुठल्याही कामा शिवाय, अपेक्षे शिवाय तो हे करत होता. तो ओळख ठेवत होता.

Pic Credit: https://images.app.goo.gl/F3K9dvoNgeoDVhBm7

एक दोन भेटीत त्याला समोरच्या प्राण्याच्या आवडी निवडी कळू लागल्या मग तो त्या अनुषंगानी त्यांच्याशी बोलू लागला, त्यांना आवडणा-या विषयाची अधिकाधिक माहीती करून घेऊ लागला, त्या प्राण्यांना ती माहीती नसेल तर ती देऊ लागला, सहज शक्य असल्यास त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना भेट देऊ लागला. अगदी निरपेक्ष भावाने. तो ओळख वाढवत होता.

आता त्याची ओळख त्याच्या एवढ्या, त्याच्या पेक्षा छोट्या, मोठ्या सगळ्या प्राण्यांशी, पक्षांशी झाली होती. इतकच काय, प्रत्येक गेंडा सवयीनं एकाच ठिकाणी मैला विसर्जन करतो, त्या लीद मधे काही किडे आपलं जिवन व्यतीत करतात. त्या किड्यांशीही तो मायेने पण आपला आणि त्यांचा आब राखून बोलत असे.

त्याला कधी शिकारी दिसले तर तो ईतरांना सावध करी. बोलता बोलता तो इतर प्राण्यांनाही असं करण्याची विनंती करे. आणि सगळ्यांच्या आवडत्या बच्चूची विनंती कोण ऐकणार नाही? जंगलात काही खुट्ट जरी वाजलं तरी त्याला कळू लागलं, शिकारी यायच्या आधिच आईला ईतर मित्रांना सुरक्षित स्थळी घेऊन जाता येऊ लागलं.

बघता बघता त्याच्या ओळखी खूप वाढल्या आणि त्याचा फायदा त्याला शिका-यांपासून वाचायला तर झालाच पण त्या शिवाय त्याला कोवळं लुसलिशित गवत कुठे आहे, रसदार फळं कुठे आहेत हे ही कळू लागलं. दर पावसाळ्यात ब्रह्मपुत्रला येणा-या संभाव्य पुराची नदीच्या उत्तर तटावर राहाणा-या प्राण्यांकडून पुर्व सुचना मिळू लागली. त्यातून सगळ्यांना वाचवता येऊ लागले. साध्या एका ओळख ठेवण्याच्या, वाढवण्याच्या सवयीनी इतका फायदा होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं!

एकुणात आपला बच्चू सुखानं काझीरंगात विहरू लागला!

Pic Credit: https://images.app.goo.gl/fkRXjjdqzUV9jdcPA


तात्पर्यः १. होऊन गेलेल्या घटनांचं दुखः करत बसण्यात काहीच हाशिल नाही.
       २. पुर्ण मनापासून, जिद्दीनं केलेल्या कामात यश मिळतच.
      २. आपण शक्य ती मदत निरपेक्षपणे करत जावी. कधी ना कधी त्याचा नक्कीच आपल्याला           फायदा होतो.
      ३. ओळख जपणे, वाढवणे हे ज्याला जमतं त्याचं आयुष्य खूप सुखकर होतं

_______________________________________________________________________


No comments:

Post a Comment